Pages

Tuesday 16 June 2015

पावसाळ्यातील भटकंती

पावसाळ्यातील भटकंती
 
पावसाळा, हुरूप व चैतन्य -
पावसाळा आला की प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं. प्रत्येकाचं मन ओल्या चिंब वातावरणात न्हाऊन निघत असते. अश्या वेळेस अनेकांचे बेत ठरतात ते गरमागरम चहा आणि कांदा भजीचे. पण आपल्या सारख्या भटक्यांचे पाय मात्र घरी टिकत नसतात. मग इथे ठरतात डोंगरवर चढ़ाई चे बेत. चार पाच टाळकी जमावयाची, शहरातील गर्दी पासून दूर एखाद्या आड़ वाटेला जायचे, हिरव्यागार जंगलातील वाटेवर चालत असताना आभाळातून बरसणाऱ्या पावसात भिजायचे, एखाद्या कड्यावरुन कोसळणाऱ्या फेसाळत्या धबधब्यात चिंब व्हायचे, किल्ल्यांवरील अवशेष पाहत तेथील इतिहासात रममाण व्हायचे, डोंगरावरील धुक्यात हरवून जायचे, पायथ्याच्या वाडीत एका म्हाताऱ्या आईने अतिशय मायेने वाढलेल्या गरमा गरम पिठलं भाकरी वर ताव मारायचा.
असंच सगळं छान छान वाटत असताना एखाद्या आड़ वाटेवर गेलेल्या काही लोकांच्या क्लेश दायक बातम्या पण कधीतरी हळूच कानावर पडतात. एखाद्याला रेस्क्यू करायची वेळ येते, एखादा कायमचा जायबंदी होतो तर एखादा आपल्या प्राणास मुकतो. अश्या वेळेस भटकंती ला गालबोट लागते.
या विषयावर सांगताना नवख्या भटाक्यांना गृहीत धरूनच काही गोष्टी संगितल्या जातील तर काही गोष्टी केवळ पावसातीलच नव्हे तर सर्व प्रकारच्या वातावरणात उपयोगी पडतील.
ट्रेक चे प्लानिंग / पूर्वतयारी -
भटकंती करताना सगळ्यात महत्वाचे असते ते प्लानिंग अथवा पूर्वतयारी. जेथे जायचे त्या ठिकाणाची सखोल माहिती असणे फार गरजेचे आहे. त्या करीता विविध वेबसाइट वर शोधून सम्बंधित ठिकाणा बद्दल ची माहिती गोळा करावी. तेथे जाऊन आलेल्या दो-चौ जणांशी बोलून तेथील मार्गा बद्दल चौकशी करावी, फ़ोटो पहावे, नकाशा पहावा, वाटेवरील खाणा खुणांची माहिती घ्यावी व आपल्यासोबत येत असलेल्या इतर सवंगड्यांना ती द्यावी.

बरेचदा जंगलात वा धुक्यात वाट चुकण्याची शक्यता असते त्यामुळे एखादा माहितगार सोबत असलेला नेहमीच चांगला. शक्यतो गावातील एखादा वाटाडया घेता आला तर उत्तम. परंतु त्यांच्याशी देवाण घेवाणी बद्दल आधीच बोलणी करून घ्यावी म्हणजे नंतर वाद होत नाहीत.
एकट्याने भटकंती करणे टाळावे तसेच आपण जेथे जातोय त्याबद्दल घरच्यांना कल्पना जरूर द्यावी.
पावसाळ्यात शक्यतो सोप्पी श्रेणी असलेले गड किल्ले अथवा घाटवाटा ची निवड करावी. ज्या ठिकाणी रॉक क्लाइम्बिंग करावे लागत असेल अथवा जेथे दरड कोसळण्याची शक्यता असते अथवा दरड कोसळून अपघात झाल्याचा इतिहास असतो अश्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे.
विविध ऋतुंमध्ये वेगवेगळ्या वातावरणात एकाच ठिकाणी आपल्याला अनेक वेगळे अनुभव येतात. पावसात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात एकच गड वेगवेगळा भसतो. परंतु काही लोकांना एकाच ठिकाणी पुनः पुनः जायला आवडत नाही.
एखाद्या किल्ल्यावर फार तूरळक अवशेष असतात तर एखादा राजगड सारखा किल्ला अवशेषांनी व त्या भूमिवरील ऐतिहासिक घटनांनी समृद्ध असतो. अश्या उंचीवरच्या ठिकाणी पावसाळयातील धुक्यात ना अवशेष पाहता येत ना वरून दिसणारे दृश्य. अश्या वेळेस एकतर असा किल्ला पाहणे टाळावा अथवा पुनः त्यास भेट द्यायची तयारी ठेवावी.

एखाद्या संघटने सोबत जात असलो तर त्या संघटने बद्दल जाणून घ्यावे, त्यांच्या सभासदां कडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे ना याची चौकशी करून घ्यावी. त्यांचे दूरध्वनी क्रमांक आपल्या घरच्यांना देऊन ठेवावेत.
पेहराव कसा असावा ? -
नवीन एखादा भटका साधारण विचार करतो की पावसात जायचे आहे भिजायला आणि मज्जा मस्ती करायला, चिखल माती लागून ख़राब तर होणार असे समजून अडगळीतील एखादी जुनी बॅग, पडिक बूट बाहेर निघतात. हे टाळावे. अश्या वेळेस बॅग फाटली, चैन तुटली, पाण्यात भिजुन बुटाचा सोल निघाला तर पंचाईत होते. एकदम नविन करकरित बूट घातले व ते पायाला चावले तरी संकट. त्यामुळे एकतर नविन बूट 8-10 दिवस वापरून पहावेत अथवा रोजच्या वापरतील बूट घालावेत. अनुभवाने सांगेन की एक्शन ट्रैकिंग चे बूट हे सगळ्यात चांगले. स्वस्त आणि मस्त. दिसायला साधे असले तरीही ओल्या खड़कावर देखील घसरत नाहीत. शेवटी माणूस चलताना कसा तोल सांभाळतो यावर सगळे अवलंबून असते. सोल निघुन पंचाइत होण्यापासून वाचण्याकरिता जुन्या एखाद्या बुटाची नाड़ी आपल्यासोबत असली की फाटलेला बूट बांधता येतो.
भटकंती साठी निघताना पेहराव हा नेहमी आपल्याला कम्फ़र्टेबल असा असावा. भटकंती करताना आपल्याकडे कमीत कमी वजन असावे. जीन्स ची पैंट शक्यतो टाळावी कारण भिजल्यावर तीचे वजन वाढून आपल्याला त्रास होतो. ती सुकण्यास देखील जास्त वेळ जातो. शिवाय अंगाला चिकटून असल्यामुळे व्यवस्थित मोकळेपणाने हालचाल करता येत नाही.

हाफ पैंट व अर्ध बाह्यांच्या टी शर्ट मुळे आपले अर्धे अंग उघडे असते. पावसात बहुतेक ठिकाणी झाडोरा माजलेला असतो. काटेरी झुडुपे वाढलेली असतात. त्यांचा शरीराशी संपर्क होऊन घाज येणे, कापणे, हाता पायावर ओरखडे येणे वगैरे पासून वाचण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे सोईस्कर. सध्या लवकर सुकणारे - क्विक ड्राय प्रकारचे कपडे मिळतात ते पावसाळी भटकंती करीता उत्तम.
सोबत बाळगण्याची औषधे -
पावसाळया तील बदलत्या वातावरणात कधी कुणाची तब्येत बिघडेल सांगता येत नाही. सर्दी ताप तर नित्याचेच. त्यामुळे ग्रुप मधील एक अथवा दोन व्यक्तींकडे औषधांचा साठा असावा. प्रथमोपचार करण्याचे प्रशिक्षण घेतले असेल तर उत्तम.
सर्दी - खोकला
ताप
उलटी - जुलाब
पोटात मळमळ
सांधेदुखी
जखम होणे
चपलांमुळे पायाला फोड़ येणे
भाजणे
मुरगळणे
काटा रुतणे
खाज व बुरशी येणे
इत्यादिवर औषध असणे गरजेचे आहे.
एखाद्याला डॉक्टर ने काही औषधे दिली असल्यास ती जरूर सोबत बाळगावित. दमा अथवा ऊंचीचा त्रास अथवा एखाद्या विशिष्ट आजार असल्यास ग्रुप लीडर ला त्याबद्दल आगाऊ कल्पना द्यावी.

दाट जंगलातील ठिकाणी ट्रेकिंग ला जाताना जळवांपासून वाचण्याकरिता बाजारात मिळणारी तंबाखूची पेस्ट सोबत बाळगावी. जळू लागल्यास हि पेस्ट लावावी.

पावसाळ्यात आल्हाद दायक वातावरणात तहान लागत नाही परंतू चालल्यामुळे, चढल्यामुळे शरीरातील पाणी वापरले जाते. अश्या वेळेस पाणी न प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन पायात वात येण्याचा संभव असतो. त्यामुळे प्रत्येकाने भरपूर पाणी प्यावे.  

सुरक्षा व खबरदारी -
भटकंती करताना आपण ज्या ठिकाणी जाणार त्याबद्दल ची माहिती आपण आधीच काढलेली असते परंतु निसर्ग हा चमत्कारिक आहे. तो जेव्हडा सुंदर वाटतो तेव्हडच त्याचं रौद्र रूप पण दाखवतो.  संकटे कधी सांगून येत नसतात त्यामुळे आपण आपल्या परीने सदैव तयार असले पाहिजे. भटकंती करताना आपण दोन-तीन च्या ग्रुप मध्ये असू अथवा 20-30 च्या ग्रुप मध्ये, आपल्या पैकी एकाने तरी एक 50 ते 100 फुटाचा दोर नेहमी सोबत बाळगावा.
कधी अचानक पावसाचा जोर वाढतो, दरड कोसळते, नदी नाल्यांत पाण्याचा जोर वाढतो. वर जाताना छोटुसा असणारा ओढ़ा येताना प्रचंड रूप धारण करून आडकाठी करीत वाहत असतो. अश्या वेळेस खचलेला रस्ता वा तुडुंब पाण्याने वाहणारा ओढ़ा ओलांडताना दोराचा उपयोग होतो.
नुसता दोर सोबत असून काय उपयोग? दोर कसा बांधावा याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. बेसिक 4 नॉट्स ची माहिती करून घ्यावी, त्या बांधण्याचा सराव करावा व तदन्य लोकांकडून खातरजमा करून घ्यावी. विविध प्रकारच्या नॉट्स ची माहिती वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
फ़क्त आपल्या ग्रुप मधील एका व्यक्तीला थोडा सराव आहे म्हणून केवळ एकाच व्यक्तीच्या भरवशावर जाणे टाळावे. त्याच व्यक्तीला काही दुखापत झाली तर इतरांना सांभाळून घेणारा लागतोच. त्यामुळे सर्व भटाक्यांनी इतर कुणावर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण व्हावे. प्रत्येकाने आपापली काळजी स्वतः घेण्यास सक्षम व्हावे. अर्थात हे थोड्या अनुभवानेच शक्य होईल.
भटकंती च्या वेळेस तेथील नागरिकांशी विनाकारण बोलणे टाळावे, त्यांच्यावर, त्यांच्या जीवन पद्धतिवर, त्यांच्या पेहरावावर कुठल्याही प्रकारची टिका टिप्पणी टाळावी. भांडण तंटा करू नये.

भटकंती ला जायच्या ठिकाणचा, पायथ्याच्या वाडीतला एखादा गावकऱ्या चा संपर्क क्रमांक आपल्याकडे असावा. अवघड प्रसंगी त्यांना बोलावता येते.
अंधार पडायच्या आधी पायथ्याला पोहोचण्याचा प्रयत्न करावा कारण मग तेथील ट्रांसपोर्ट वाले अव्वाच्या सव्वा भाव लावतात. अगदी उशीर झालाच तर अंधारात वाट शोधण्यासाठी विजेरी (टॉर्च) असलेला बरा म्हणून अगदी एक दिवसाच्या भटकंती मध्ये सुद्धा विजेरी सोबत ठेवावी.
पैकिंग कशी करावी ? -
बॅग मध्ये सामान भरताना तोल सांभाळला जाईल अश्या रीतीने भरावे. आपले सर्व सामान जे भिजण्याची शक्यता वाटते ते ते सर्व प्लास्टिक च्या पिशवीत गुंडाळून ठेवावे. भटकंती करताना क्वचितच वापरले जाणारे सामान खाली तर पुनः पुनः लागणारे सामान वर ठेवावे. लक्षात असू देत की पाण्याने बॅग भिजली की बॅग मध्ये जाणारे पाणी एकतर चैन मधून अथवा चैन च्या शिलाई मधून खाली उतरते. बॅग च्या कापडा तून झिरपत झिरपत पाणी खाली उतरते व तळाशी जमा होते. त्यामुळे अधिकचे कपडे, अंथरूण / स्लीपिंग बैग असे हलके सामान जे आपण नेहमी सगळ्यात खाली ठेवतो ते भिजण्याची शक्यता फार जास्त असते. त्यामुळे कपडे व अंथरुण भरताना नेहमी व्यवस्थित जाड अश्या कमीत कमी दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवाव्यात.
एकच भली मोठी पाण्याची बाटली घेण्या पेक्षा दोन बाटल्या असाव्यात जेणेकरून बॅग मधील सामानाचा तोल सांभाळला जाईल.
दोर, औषधे, खाऊ, पाणी असे सामान पटकन काढता येईल अश्या प्रकारे वरच्या कप्प्यात ठेवावे. खाण्याचे पदार्थ सहजा सहजी दिसतील अश्या प्रकारे कधीही ठेवू नयेत जेणेकरून माकडे त्याकडे आकर्षिली जाणार नाहीत व तुमचा खाऊ माकडांपासून सुरक्षित राहील.
कॅमेरा कापडात गुंडाळून ठेवू नये कारण हवेतील आर्द्रता शोषुन घेतल्यामुळे कापड भिजते व या दमटपणामुळे कॅमेरा मध्ये बूरशी निर्माण होउ शकते. कॅमेरा बॅग मध्ये नेहमी आर्द्रता शोषून घेणाऱ्या सिलिका जेल च्या पुड्या ठेवाव्यात. पावसात फ़ोटो काढण्याचा मोह आवरता येत नसेल तर सोबत छत्री असावी.
निसर्ग नियम पाळणे -
आपण निसर्गा च्या सहवासात असताना आपल्याकडून निसर्गाची कुठल्याही प्रकारे हानी होता कामा नये. झाडाच्या फांद्या तोड़ने, झुडुपे मुळासकट उपटणे, कुठल्याही प्रकारचा कचरा करणे हे सर्वतोपरी टाळावे. प्रत्येक भटक्याने आपल्या सोबत एक पिशवी बाळगणे गरजेचे आहे. सहजा सहजी विघटन न होऊ शकणारे जे जे काही असेल ते ते सर्व पुनः आपल्या सोबत आणून शहरातील कचरा कुंडीमध्ये टाकावे.
बरेच जणांना सवय असते की ते शौचाला जाताना नेलेली पाण्याची बाटली फेकून देतात. केवळ शौचाला बाटली नेली म्हणून फेकून देण्याची सवय बऱ्याच जणांना असते. या बद्दल भावनेच्या आहारी न जाता प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.
डोंगरावर चढल्यावर पुनः खाली यायचेच आहे त्यामुळे काहीतरी अचाट साध्य केल्याचा अहंकार वरच ठेवून या. आपल्यामुळे कुणाला स्वतःची कामे टाकून आपला जीव वाचवण्यासाठी येऊ लागू नये ह्याची काळजी प्रत्येकाने आपापली घ्या. अर्धवट माहितीच्या आधारे पराक्रम गाजवू नका. निसर्गाशी मैत्री करा, निसर्गाच्या सन्निध्यात स्वतःचे सुख शोधा, निसर्गाचे नियम पाळा, निसर्गाचा आदर करा. जमेल तेव्हडा इतिहासाचा, भूगोलाचा, सह्याद्रीचा, तेथील वन्य जीवनाचा अभ्यास करा पावसाळी भटकंती चा योग्य तऱ्हेने आनंद घ्या.
- समीर

4 comments: